नाशिक, दिनांक 14 सप्टेंबर 2020 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा) :
कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ते गरजू लोकांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत त्वरीत लाभ मिळून या योजनेची पारदर्शक व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने संदर्भात बैठक पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नाडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अतिरीक्त शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अनंत पवार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे क्षेत्रिय व्यवस्थापक कुलदीप शिरपुरकर, जिल्हा प्रमुख डॉ. पंकज दाभाडे, जिल्हा प्रमुख डॉ. विपुल चोपडा, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. संकीत साकल तसेच कोविड साथरोगाच्या उपचारात समावेश असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी रूग्णालये तसेच धर्मदाय संस्था, वैद्यकिय महाविद्यालय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, कोविड-१९ या साथरोगाची परिस्थिती अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. या परिस्थितीत सर्व सामान्य ते गरजू रुग्णांना आरोग्य संबंधित सर्व सेवा उपलब्ध होण्यासाठी शासनस्तरावर महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभा सामान्यपर्यंत प्रभाविपणे पोहचण्यासाठी सदर योजनेत सुसुत्रता आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी रूग्णालये तसेच धर्मदाय संस्थांनी एकत्रितपणे येवून काम करणे आवश्यक आहे. हे काम करत असतांना भरारी पथकाच्या सहाय्याने या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी होत आहे की नाही, याची सत्यता पडताळून तसा अहवाल सादर करावा असेही, जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त रुग्णालयांचा या योजनेंतर्गत समावेश करून उपचारासाठी रुग्णांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. त्याच बरोबर या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी असणाऱ्या नियमांची व बदलांची अद्ययावत माहिती संबंधित रुग्णलयांना वेळोवेळी उपलब्ध करून देण्याच्या ही सुचना या वेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सद्यस्थितीत अनेक बाबतींत मध्ये शासनाने नियमांमध्ये शिथिलता दिलेली आहे, त्यास प्रसिद्धी देवून या योजनेंतर्गत जास्तीत जास्त रुग्णांचा समावेश करण्याचे प्रयत्न रुग्णालयांनी करावेत असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले. या संपूर्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातून दररोज सनियंत्रण करण्यात येणार असून या संनियंत्रणची जबाबदारी श्री निलेश श्रिंगी उपजिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.