मालेगाव शहरातील अनेक रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहे, चर्च- टेहरे फाटा रोडवर रोजच अनेक लहान-मोठे अपघात होत असतात, अनेक दिवसांपासून रहिवाशांनी सदर रोड वर अवजड वाहतूक बंद करण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली परंतु अद्याप पावतो त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे,
काल एका भरधाव कंटेनर ने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका तरुणीला जबर धडक दिल्याने तरुणी गंभीर जखमी झाली, नंतर तिला उच्चारासाठी नाशिक येथे नेण्यात आले परंतु तिथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला, एका उद्योन्मुख व महत्त्वकांक्षी खेळाडू तसेच भावी पोलीस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत होणे नक्कीच चटका लावून जाते, त्यामुळे परिसरात हळहळ तर व्यक्त होतच आहे पण त्यापेक्षा नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश व संताप प्रशासनाबद्दल दिसून येत आहे
सकाळी साडेसात वाजण्याची वेळ GJ27TD6290 हा कंटेनर भरधाव वेगाने डिके चौकातील वडाच्या झाडाची मोठी फांदी तोडत सुसाट वेगात पुढे जात तुळजाभवानी मंदिराजवळील ओमस्वर्ग इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान केले आहे याशिवाय अविनाश बच्छाव यांच्या कंपाउंड वॉल सह दारात असलेले मोठे बदामाचे झाड ही तोडून पुढे भरधाव वेगात निघून गेला, व गिरणा पुलाजवळ मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोघा मुलींपैकी एकीला जबर धडक दिल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली, नागरिकांच्या मदतीने तिला सुविधा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले परंतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला नाशिक येथे हलविण्यात आले परंतु उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला
वास्तविक हा रस्ता अत्यंत दाट लोकवस्ती मधून जातो, इतर कॉलनी मध्ये जाण्यासाठी हे रस्ते काटकोनात एकमेकाला जोडले आहेत त्यामुळे कोणतेही वाहन अचानक समोर आल्याने वाहनचालकांसह विद्यार्थी अबाल वृद्धांची मोठी तारांबळ होते, त्यामुळे अनेक वेळा लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहेत.
बऱ्याच वेळा नागरिकांनी निवेदने देऊनही प्रशासन याकडे अत्यंत सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले,
हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला असून आत्तापर्यंत चार जणांचे जीव या रस्त्यामुळे गेले आहेत तर अनेकांना अपंगत्व आले आहे पण तरीही या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, मध्यंतरी प्लास्टिकचे स्पीड ब्रेकर्स या रस्त्यावर लावण्यात आले होते पण निकृष्ट दर्जा असल्यामुळे काही दिवसातच ते उखडून गेले आहेत, त्यामुळे वाहन चालक केवळ रस्ता चांगला आहे म्हणून अत्यंत सुसाट वेगात वाहने चालवताना दिसतात, त्यामुळे नागरिकांना अगदी जीव मुठीत घेऊन या रस्त्याने चालावे लागते, संबंधित विभागाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या रस्त्यासाठी वेग मर्यादा वीस किमी प्रति तास दिलेली असताना कोणतेही वाहन किमान 60 ते कमाल 120 च्या स्पीडनेही या रस्त्यावरून वाहने हाकत असतात त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, संबंधित विभागही याकडे कानाडोळा करून असतो, त्यामुळे अशा प्रकारच्या अपघात होऊन निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो