YouTube Video Carousel

कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा: अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी

 सध्या कोरोनावर कोणत्याही प्रकारचे ठोस औषध सापडलेले नाही. इतर औषधोपचारासह रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असेल, तर सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा नियमीत वापर व सॅनिटायझरचा वापर या गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क लावूनच कामानिमित्त बाहेर फिरावे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर आता महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.


कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मास्क वापरा, असं आवाहन राज्य सरकार वारंवार करत आहे. मात्र, नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान येथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहे. काही प्रमाणात आता रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कामानिमीत्तच बाहेर पडावे, शासनामार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. काही नागरिक हे हलगर्जीपणा करतांना दिसत आहे. त्यामुळे आता अशा बेजबाबदार नागरिकांवर पोलीस  प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात येतील असेही अपर पोलीस अधिक्षक श्री.खांडवी यांनी नमूद केले आहे.


नुकतेच शासनाच्या निर्देशानुसार विविध प्रार्थना स्थळे खुली करण्यात आली असली तरी त्या ठिकाणी शासनाच्या नियम व अटींचे पालन होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या सुरवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरातील नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून प्रशासनास वेळोवेळी सहकार्य केले आहे. यापुढे येणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी व कोरोनाची संभाव्य दुसरी लाट थोपविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास करोनासंसर्ग नियंत्रणात येऊ शकतो. परंतु, तसे होत नसल्याने आता नियमांची अमंलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क बंधनकारक करताना बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी नमूद केले आहे.


Previous Post Next Post