राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया दीड वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत २६ जिल्ह्यांमधीलच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरीत आठ जिल्ह्यांतील ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (ता.९) सांगितले.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासाठी नुकतीच मान्यता दिली आहे.
त्यामुळे नगर जिल्हा वगळून अन्य सर्व जिल्ह्यांमधील तलाठ्यांची रिक्त पदे दिल्याने तातडीने भरली जाणार असल्याचेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
थोरात म्हणाले, "यापूर्वी राज्यातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली या २६ जिल्ह्यातील तलाठी पद भरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
मात्र नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, नगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांत ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र अर्थ विभागाने ४ मे २०२० ला सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य सर्व विभागातील नोकर भरतीला स्थगिती दिली. यामुळे ही प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे."
